ऑनलाईन शिक्षणासाठी गरीब विद्यार्थ्यांना शासनाने मोबाईल किंवा टॅब मोफत द्यावा: श्रीशैल बिराजदार
जत:प्रतिनिधी
राज्यातील शाळा अद्यापही बंद आहेत. शाळा, महाविद्यालये केव्हा सुरू होतील हे सांगता येत नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी गरीब विद्यार्थ्यांना शासनाने मोबाईल किंवा टॅब मोफत द्यावा, अशी मागणी राजसपा पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल बिराजदार (सावकार) यांनी केली आहे.
करोना व्हायरसमुळे मार्च २०२०च्या मध्यावर शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. याचा परिणाम शिक्षणक्षेत्रावर झाला. शिक्षक आणि विद्यार्थी घरात अडकून पडले तरी शिक्षण दिले व घेतले जाऊ शकते आणि तेसुद्धा रोज वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही कल्पना जोर धरू लागली. प्राथमिक ते अगदी पदव्युत्तर स्तरावरील अध्ययन व अध्यापन ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले. साधनांच्या साहाय्याने मिटिंग्ज आयोजित करून दैनंदिन ऑनलाईन अध्यापन सुरू झाले. लॉकडाउनमुळे मुलांच्या अभ्यासाचे होणारे नुकसान टळले. वेळापत्रक लावून शाळेप्रमाणेच शिक्षकांचे अध्यापन सुरू झाले. केवळ यावरच न थांबता विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी प्रश्न देणे, वेगवेगळे उपक्रम देणे, त्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेणे, विविध उपक्रमांद्वारे त्यांचे मूल्यमापन करणे, त्यांना प्रत्याक्षिक देणे या गोष्टी घडू लागल्या.
असे असले तरी हा अभ्यासक्रम सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे, असे म्हणता येणार नाही. गरीब विद्यार्थ्यांसाठी मोबाईल घेणे जिकिरीचे आहे. शेतकरी व शेतमजूर व हमाल यासारख्या काम करणाऱ्या लोकांना मुलांसाठी मोबाईल घेणे शक्य नाही.
ऑनलाईन राहून अध्यापन करणे, त्यासाठी विशिष्ट तयारी करणे, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर समजून घेणे, नवनवीन प्रकारची अॅप्लिकेशन्स माहीत करून घेणे, त्यांचा सराव करणे, त्यातील तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करून त्यातील अडचणींवर मात करणे, विद्यार्थ्यांना त्याचे प्रशिक्षण देणे, त्याद्वारे अध्ययन कसे सुलभ होईल, याचे मार्गदर्शन करणे ऑनलाईनमुळे शक्य झाले आहे. मात्र सर्वच मुलांना मोबाईल घेणे शक्य नसल्याने कमीत कमी स्वस्तातील मोबाईल किंवा टॅब देणे गरजेचे आहे.
ऑनलाईन शिक्षण तर अटळ आहे. अशा परिस्थितीत जो कौशल्ये आत्मसात करेल, तोच टिकेल. त्यामुळे शिक्षक असो वा विद्यार्थी काळाबरोबर चालण्यासाठी नवी कौशल्ये आत्मसात करणे आणि ती कालानुरूप अद्ययावत करत जाणे, हे येत्या काळात तग धरून राहण्यासाठीचे महत्त्वाचे हत्यार आहे. कर्नाटक शासनाने पाच हजाराच्या आतील किंमत असलेल्या मुलांना मोबाईल देणे सुरू केले आहे. त्याच आधारे केंद्र किंवा राज्य शासनाने गरीब व होतकरू मुलांना मोबाईल द्यावेत, अशी मागणी बिराजदार यांनी केली आहे.
संपादक
शशिकांत हेगडे
मो.90110 19031
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा